ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे
(१)
ग्रामीण आणि दलित साहित्यलेखनाला सुरुवात होऊन आता बराच काळ लोटला आहे. या साहित्यप्रकारांवर आतापर्यंत खूप चर्चा व लेखनही झालेले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात साहित्याच्या प्रवाहाबाहेरील, दुर्लक्षित, उपेक्षित अशा जीवनाविषयीचे दलित व ग्रामीण साहित्य आज मराठी साहित्याचा मध्यवर्ती प्रवाह बनलेलेले आहे, ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे.
दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्याने भारतीय साहित्याला दिलेली मोठी देणगी आहे. खास मराठी मातीतून उगवलेलं, अस्सल देशीवादी साहित्य म्हणून या साहित्याचा उल्लेख करता येईल. प्रस्थापित मराठी साहित्य हे मध्यमवर्गीय जीवनाभोवती रुंजी घालत असताना, रंजनवादी, कलावादी विचारांचा मराठी साहित्यावर जबरदस्त प्रभाव असताना ग्रामीण व दलित साहित्याने मराठी साहित्याला वास्तवाभिमुख, समाजाभिमुख करण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे.
ग्रामीण आणि दलित साहित्यात पुष्कळ साम्य आहे. त्यातील एक म्हणजे या दोन्ही प्रकारच्या साहित्यात गावातील व गावकुसाबाहेरील लोकांच्या जीवनाचे चित्रण आलेले आहे. मात्र ग्रामीण साहित्यात गावकुसाच्या आतील लोक केंद्रभागी असतात; तर दलित साहित्यात गावकुसाबाहेरील. उपेक्षित विश्वाचे, खऱ्या-खुऱ्या दुःखांचे, मानवी भावभावनांचे, ग्रामीण भागात, गावकुसाबाहेर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दुर्लक्षित, अज्ञान, दारिद्र्य, भूक, शोषण, वेदना यांनी पिचलेल्या समाजाचे, इथल्या मूळ मातीचे, लोकपरंपरांचे, लोकसंस्कृतीचे, शिक्षणाने, महापुरुषांच्या विचारांनी, कार्याने जागृत झालेल्या, परिवर्तनाच्या टप्प्यावर, उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या, आत्मभान प्राप्त झालेल्या, आपल्या हक्कांसाठी, साध्या माणूसपणाच्या अधिकारासाठी विद्रोहास सज्ज असलेल्या मानव समुहांचे, त्यांच्या बदलत चाललेल्या जीवनाचे, येथल्या कृषिसंस्कृतीचे, आदिम जीवनाचे अशा या मध्यमवर्गीयांना अपरिचित असलेल्या विश्वाचे दर्शन ग्रामीण व दलित साहित्याने मराठी वाचकाला घडविले.
(२)
Read More