ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा

ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा

              १९६० नंतर मराठी साहित्यात जे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या अतिशय मोलाची भर घातलेली आहे. एक नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र मराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले. या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्याने केले आहे.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

  • ‘ग्रामीण साहित्य’ संकल्पना- 

           ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना समजून घेत असताना आधी ‘ग्रामीण’ ही संकल्पना समजून घ्यावी लागते. ‘ग्रामीण’ या शब्दातून ग्राम-गाव-खेडे इत्यादी गोष्टी लक्षात येतात. ग्राम-गाव किंवा खेडे याची रचना, त्याचे स्वरूप-वैशिष्ट्ये समजून घेतल्यास ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट होऊ शकते.

        अलीकडे ग्रामीण जीवनात अनेक परिवर्तने घडून आलेली आहेत. त्याआधी गाव हे गावगाड्यावर आधारलेले होते. या गावगाड्यात शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, दलित, फिरस्ते इत्यादींचा समावेश होता. हे सर्व घटक गावपातळीवर एकमेकांशी निगडित व परस्परांवर अवलंबून होते. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय, उत्पन्नाचे मुख्य साधन. शेती करणारा शेतकरी. त्याला शेती व गृहोपयोगी वस्तू व अवजारे करून देणारे सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, सोनार इ. जाती किंवा व्यावसायिक; सेवा पुरवणारे न्हावी, रामोशी, धोबी, कोळी; ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगळा इत्यादी जाती. या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेतकर्‍याकडे शेतीतून उत्पन्न आल्यावर तो त्यातून विशिष्ट हिस्सा किंवा वाटा या सर्व घटकांना द्यायचा, त्याला ‘बलुते’ असे म्हणायचे. ते त्यांच्या कामाचा व श्रमाचा मोबदला म्हणून दिले जायचे. या बलुत्यावर या जाती-व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालायचा. याचा अर्थ शेती ही केंद्रस्थानी होती व इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना परिवर्तनपूर्व काळात अस्तित्वात होती.

Read More