माझ्या दहा वर्षाच्या व सात वर्षाच्या मुलाला मी आत्ताच (दि. ०७/०४/२०२३, सकाळी) जवळ घेऊन युरोपातील प्रबोधन युग समजावून सांगत होतो. ज्याची सुरुवात गॅलिलिओ यांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती
फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही’, हे सांगितले तेथून झाली. बायबलमध्ये लिहिलेले ईश्वराने सांगितलेले चुकीचे असू शकते, येथून युरोपातील प्रबोधन युगाची सुरुवात झाली. आपल्याकडे आपण हे जर बोललो नाही तर गेल्या दीडशे वर्षात जे थोडेफार प्रबोधन व्हायला लागले होते, ते देखील मागे पडेल व पुन्हा अंधारयुग निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. समाज अवैज्ञानिक, असंभवनीय गोष्टींवर विश्वास ठेवतो, पुन्हा पुन्हा सांगतो व आपण फक्त प्रश्न उपस्थित केला तर आपल्यातेच लोक ‘इतर अनेक प्रश्न आहेत’, असे म्हणतात. इतर अनेक प्रश्न तर कायमस्वरूपीच राहणार आहेत. ते कधीच कायमस्वरूपी संपणार नाहीत. मग आपण या प्रश्नांना, या विषयांना भिडायचेच नाही का?
(एका पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया)
यासोबत इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारतात व्यापाराला केलेली सुरुवात, यंत्रांच्या साहाय्याने वस्तू बनवून त्या भारतात विकणे, त्यामुळे आपल्या भारतातील रोजगार नष्ट होणे, प्लासी-बक्सारची लढाई, मीर जाफरची फितुरी अशा अनेक गोष्टी मी त्यांना सहज बाजूला बसवून सांगितल्या. माझा छोटा मुलगा रात्री झोपायच्या आधी त्याच्या बालशैलीत त्याच्या आईला सर्व घटना व्यवस्थित सांगत होता. फक्त काही कठीण नावे त्याला आठवत नव्हती. ‘धर्मपीठ’ या शब्दाऐवजी त्याने कोणत्या तरी पीठासमोर त्याला (गॅलिलिओला) उभे केले, असे म्हटल्यावर सर्वजण हसलो. पण त्याची बौद्धिक मशागत सुरू झाली, हे महत्त्वाचे.