
बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्फ भीमराव रामजी आंबेडकर हे जगातील सार्वकालीन थोर विद्वान, अभ्यासक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे ज्ञान त्यांनी त्यांच्या स्वतःच्या करिअर व विकासापुरतेच सीमित ठेवले नाही. तर भारतातील ५००० वर्षांची शोषणाची, गुलामीची परंपरा मोडून काढण्यासाठी, येथील सामान्य माणसाला सामाजिक गुलामीतून, शोषणातून मुक्त करण्यासाठी, त्याच्या जगण्याला पशुपातळीवरून मानवी पातळीवर आणून अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वापरले. अशा या महामानवाच्या विद्यार्थी जीवनाबद्दल खूप कमी जणांना अचूक माहित असते. तेव्हा ते माहीत व्हावे व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, त्यांनीही ते वाचून कार्यप्रवृत्त व्हावे, म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे एकूणच विद्यार्थीजीवन आपल्यासमोर मांडत आहे.
बाबासाहेबांचे नाव भीमराव असले तरी लहानपणी त्यांना सर्वजण भिवा म्हणत. ती एकूण १४ भावंडे होती. बाबासाहेब सर्वात लहान होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. त्यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार होते. पण सुभेदार असूनही त्यांनी लष्करातील मुला-मुलींसाठी दिवसाच्या शाळा व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळांमध्ये १४ वर्षे हेडमास्तरकी केलेली असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगलेले होते. म्हणून त्यांनी भिवाच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे खूप लक्ष दिले. भिवा १-२ वर्षांचा असताना त्यांचे वडील निवृत्त झाले. त्यांना नोकरी करत असताना अल्पसे वेतन होते. निवृत्तींनंतर ते कोकणातील काप दापोली येथे स्थायिक होण्यासाठी आले. परंतु तेथे दापोली येथील नगर परिषदेच्या शाळेमध्ये अस्पृश्य मुलांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मुलांच्या शिक्षणासाठी ते १८९४-९५ च्या सुमारास मुंबई व नंतर सातारा येथे स्थलांतरित झाले.
Read More