२००६-०७ ची गोष्ट आहे. आमच्या अमळनेरमध्ये मिश्रा नावाचा एक कुणीतरी प्रसिद्ध बाबा आला होता. त्याने डोक्यावरून हात फिरवला व काही भस्म वगैरे लावले तर आपले सर्व दुःख, वेदना नष्ट होतात, इच्छा पूर्ण होतात, अशी जाहिरात करण्यात आली होती. तेव्हा व्हाट्सअप, फेसबुक नसतानादेखील त्याची
प्रचंड प्रसिद्धी झाली होती. तो येणार आहे हे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले होते.
तो मला वाटते दोन दिवस अमळनेरमध्ये होता. त्याच्या बसायची व्यवस्था रेल्वे स्टेशनच्या बाजूला प्रताप मिलच्या रेस्ट हाऊसच्या समोर करण्यात आली होती. त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी अक्षरश: एक दीड किलोमीटरची रांग लागली होती. संपूर्ण अमळनेरमध्ये जागोजागी वाहने लावली होती. लांबून लांबून लोकं आली होती. माझ्या काही वर्गमैत्रिणीही त्याचा आशीर्वाद घ्यायला गेल्या होत्या. ते आटोपल्यावर एक दोन दिवसात त्याच्यावर बलात्काराचे आरोप झाले व तो फरार झाला होता. मी माझ्या एका मैत्रिणीला म्हणालो होतो की, ‘बलात्कारी व्यक्तीचा हात डोक्यावरून फिरवून घेतला.’
(ही आजदेखील माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसांना इतक्या वाऱ्याच्या वेगाने यांच्या येण्याजाण्याबद्दल कसे काय माहिती होते व लोकं सर्व कामधंदे सोडून यांच्याकडून आशीर्वाद घ्यायला कसे काय घराबाहेर पडून रांगा लावतात.)