आपण काय शिकावं, किती फी देऊन शिकावं, कोणती पुस्तके अभ्यासावीत, आपल्या गावातील शाळा चालू ठेवावी की बंद करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा की नाही, खते कीटकनाशके बियाणे यांचे भाव काय असावा, जनतेने भेसळयुक्त अन्न
खावे की चांगले, आपल्याला आरोग्य सेवा पुरवाव्यात की नाही, आपल्या आजूबाजूची जंगलं, नद्या, समुद्र एकूणच निसर्ग यांचे जतन करावे की ते उद्ध्वस्त करावे,
देशात लोकशाही टिकवावी की संपवून टाकावी, राज्यघटनेनुसार देश चालवावा की राज्यघटना बाजूला ठेवून कारभार करावा, लोकांना रोजगार द्यावा की त्यांना बेरोजगार ठेवावं, देशात वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवावा की अंधश्रद्धा, कर्मकांडे, मागासलेपणा, धर्मांधता, कट्टरता निर्माण करावी, देशात विविध जाती व धर्मांमध्ये ऐक्य टिकवून ठेवावे की त्यांच्यात अविश्वास, द्वेष निर्माण करावा हे व अशा असंख्य गोष्टी सत्ताधारी पक्ष ठरवत असतात. म्हणून सत्तेवर कुणाला बसवायचे ते जनतेने विचारपूर्वक ठरवायला हवे. आपल्या मताला किंमत नसेल तर त्यासाठी संघर्ष करायला हवा. कारण आपले, आपल्या मुलाबाळांचे राहणीमान, भविष्य हे चांगलं असावं की नसावं हे चांगल्या राज्यकर्त्यांवर अवलंबून असतं.