शिवशंकर उर्फ महादेव हे या भारतातील वेदपूर्वकाळापासून जनमानसात रूढ असलेले दैवत आहे. शंकर हा इथल्या मातीतला सर्वसामान्यांचा मूळ देव. आदिवासी भागात आपल्याला राम, कृष्ण किंवा वैदिक देवीदेवतांची
मंदिरे आढळत नाहीत पण शंकराचे मंदिर नक्की आढळते.
शंकरापासूनच भारतातील नाथ तसेच इतर अनेक संप्रदाय व परंपरा निर्माण झाल्या. शंकराला मानणारा शैव संप्रदाय व विष्णूला मानणारा वैष्णव संप्रदाय यांच्यात हजारो वर्ष संघर्ष सुरू होता. याचा अर्थ हाच आहे की, या दोन वेगळ्या व परस्परविरुद्ध परंपरा आहेत. नंतर वैदिकांनी शंकराला त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हायजॅक केले व त्याचे मूळ विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नंतर साजूक तुपात बुडवून ते आपल्यासमोर शंकराला सादर करतात. आजच्या काळातील प्रदीप मिश्रा हे या प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. पौराणिक मालिकांनीदेखील शंकराचे विकृतीकरण घडवून आणलेले आहे. आता तर ‘एक लोटा जल और सब समस्या का हल’ एवढ्यापुरते शंकराला सीमित करून टाकलेले आहे.
बहुजनांना त्यांच्या मूळ सांस्कृतिक परंपरांपासून तोडणे व स्वतःच्या शोषणावर, विषमतेवर आधारलेल्या परंपरा समाजात रुजवणे, यासाठी खूप मोठी व्यवस्था इथल्या वैदिकांनी निर्माण केलेली आहे. तिला धर्म असे गोंडस नाव दिलेले आहे.
बहुजनांची शोकांतिका ही आहे की, त्यांच्यातील कीर्तनकार, प्रवचनकार हे सत्यशोधक व अभ्यासक नसून ते फक्त परंपरावाहक व पोटभरू आहेत. म्हणून आपल्या मारेकर्यांचे विचारच ते समाजामध्ये रुजवतात व आपल्याच समाजाला वैदिकांचे, मनुवाद्यांचे गुलाम बनवायला मदत करतात.
असो. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
डॉ. राहुल पाटील