१३ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आमच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो. पण दोन्ही वेळेस मी सत्यनारायण घातला नाही. भविष्यातही घालणार नाही.
१८५०पूर्वी भारतात सत्यनारायण घातल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. शिवाजी महाराजांनी
साडेतीनशे किल्ले जिंकले किंवा बांधले. परंतु एकदाही सत्यनारायण घातला नाही. पेशवे एवढे वेगवेगळे विधी करायचे, ब्राह्मणांना कोट्यवधी रुपयांचे दान करायचे. पण त्यांनीही कोठे सत्यनारायण केल्याचा उल्लेख आढळत नाही. हे अगदी अलीकडचे खूळ आहे.
हिंदू धर्मामध्ये दरवर्षी कमी-जास्त एक कोटी लग्न होतात. लाखो फ्लॅट, घर, दुकानं बांधली व विकत घेतली जातात. गणपतीच्या वेळेस सत्यनारायण घातले जातात. थोडक्यात, दरवर्षी साधारणतः एक कोटीच्या आसपास सत्यनारायण पुरोहितांच्या हस्ते केले जातात. एका सत्यनारायणाची सरासरी १०००/- रुपये जरी दक्षिणा धरली तरी भारतात १००० कोटी रुपयांचा सत्यनारायणाचा व्यवसाय आहे व हा व्यवसाय करणारे फक्त काही लाख पुरोहित आहेत आणि ९९% पुरोहित हे एका जातीचे आहेत. म्हणजे एकाच विधीमधून यांना किमान १००० कोटी रुपये मिळतात.
मी स्वतः एक-दोनदा हा विधी करताना मुद्दामहून थांबलेलो आहे. त्यात हा विधी केला नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते आणि हा विधी केला तर तुमचा फायदा होऊ शकतो, अशी भीती व आमिष दाखवून लोकांना हा विधी करायला भाग पाडले जाते. लोकांनी या भीतीमधून बाहेर पडायला हवे. आपली भीती, अज्ञान, दैववादीपणा हेच यांचे भांडवल आहे.
थोडक्यात, सत्यनारायणाचा व बहुजनांचा काहीही संबंध नाही. त्याच्यावाचून कुणाचेही काही अडू शकत नाही. तसेच सत्यनारायणाचा व हिंदू धर्माचा तसा अर्थाअर्थी काही संबंधही नाहीये. तो घातला नाही म्हणून हिंदू धर्म बुडून जाईल, असेही नाहीये. तो फक्त पुरोहितांचा पोट भरण्याचा धंदा आहे.
– डॉ. राहुल पाटील