आपण आस्तिक आहोत की नास्तिक हे महत्त्वाचे नाहीये.
● आपण एससी, एसटी, ओबीसी, मराठा आहोत व या देशातील बहुतांश आयएएस, आयपीएस, न्यायाधीश, महत्त्वाचे निर्णय घेणारे सत्ताधारी हे आपल्या जातींमधील स्त्रिया व पुरुष नाहीयेत, ही आपल्यापुढील समस्या आहे.
● अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये वर्षाला कोट्यवधी रुपये कमवणारे आपल्या जातीचे बहुतांश स्त्री-पुरुष नाहीयेत, ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे.
● आपण शेती करतो, कंपन्यांमध्ये राबतो, पण आपल्या श्रमाचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही व आयुष्यभर आपण दारिद्र्य, काटकसर, कर्जबाजारीपणा यात जीवन कंठतो, ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे.
● आपला शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्याची मुले नोकरी व लग्न यासाठी तळमळतात, आपलीच मुले सीमेवर शहीद होतात व देशांतर्गत दंग्यांमध्ये आपलीच मुले मरतात, मारतात, कोर्ट केसेस झाल्यावर कोर्टाच्या चकरा मारतात, ही आपल्यापुढील समस्या आहे.
● आपण कष्ट करून देश चालवतो पण आपल्याला दर्जेदार शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत, ही आपल्यापुढील समस्या आहे.
● देशातील कार्पोरेट भांडवलदार हे आपल्याला लुटण्यासाठी, कमी मोबदला देऊन राबविण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत व येथील सरकारे त्यांना सामील झाली आहेत, ही आपल्यापुढील मोठी समस्या आहे.
● इथल्या अब्जावधी रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या धार्मिक संस्थांवर, मंदिरांवर आपली मालकी नाहीये, ही आपली समस्या आहे.
● ज्याला आपण आपला धर्म मानतो, तो धर्म व त्याचे धर्मग्रंथ आपल्याला शूद्र समजतात, ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे.
- डॉ. राहुल पाटील